आज सर्वपक्षीय बैठक   

नवी दिल्ली : भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने आज (गुरुवारी) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक पावले उचलताना राजनैतिक निर्बंध घातले होते. त्यावेळीदेखील सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. त्यावरुन, विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. किमान आजच्या बैठकीत पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आजच्या बैठकीस उपस्थित राहतील, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी पत्रकारांना सांगितले. पाकिस्तानविरोधातील कारवाईचे काँग्रेसने स्वागत केले आहे. आम्हाला आमच्या भारतीय सशस्त्र दलांचा अभिमान आहे. पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईचे आम्ही कौतुक करतो. भारतीय लष्कराच्या धैर्याला, दृढनिश्चयाला अणि देशभक्तीला सलाम करतो, असे काँग्रेसने म्हटले आहे.

निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द

’ऑपरेशन सिंदूर’ नंतर निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तत्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात गृह मंत्रालयाने आदेश जारी केला आहे. त्यानुसार, आता बीएएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफ सारख्या सर्व प्रमुख निमलष्करी दलाच्या जवानांना पूर्ण दक्षतेने कर्तव्यावर उपस्थित राहावे लागणार आहे. यासोबतच, सीमावर्ती भागांमध्ये आता अतिरक्त ताफा तैनात करण्यात येणार आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्तान सीमांवर अतिरिक्त जवान तैनात केले जात आहेत. रेल्वे स्थानके, विमानतळ, मेट्रो आणि संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. केंद्रीय संस्था आणि राज्य पोलिसांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रत्येक हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

उच्चस्तरीय बैठकांचे सत्र

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर राजधानी दिल्लीत अनेक उच्चस्तरीय बैठका पार पडल्या. प्रारंभी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक पार पडली. या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उपस्थित होते. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी कारवाईबाबतची माहिती दिली. त्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली.
 

Related Articles